दिवा:-
लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, या जनभावनेच्या निर्णायक मागणीसाठी २२ डिसेंबर रोजी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भव्य जन आक्रोश दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या तयारीचा एक भाग म्हणून दिवा–आगासनगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीनंतर गावात भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती, या आंदोलनाचा स्वर बदलणारी ठरली. महिलांनी हातात घोषवाक्यांच्या पाट्या घेत सरकारकडे एकच मागणी केली — “विमानतळाला आमच्या लोकनेत्याचे नाव द्या!लोकनेते दि.बा.पाटील यांनी आयुष्यभर सर्वसामान्य, मच्छिमार, शेतकरी, वंचित आणि संघर्ष करणाऱ्या घटकांचा आवाज उचलला. त्यांचे योगदान अमूल्य असून विमानतळाला त्यांचे नाव देणे ही केवळ मागणी नसून जनतेच्या भावनांचा मान राखण्याची जबाबदारी आहे.ग्रामस्थांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की,
“जनतेचा सन्मान नाकारला तर जनआक्रोशाचा ज्वालामुखी २२ डिसेंबरला उसळेल.”दिवा–आगासनगावातील सर्व घटकांनी शासनाला विनंती केली आहे की,जनभावनेचा आदर करून त्वरित नामांतराचा निर्णय घ्यावा,अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.
