सोमवारी सकाळच्या विमानाने मुंबईत येणार

ठाणे –
स्काऊट-गाईडच्या शिबिरासाठी लखनौमध्ये गेलेल्या आणि रेल्वे चुकल्यामुळे शुक्रवारपासून तिथेच अडकलेल्या 16 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांची परतण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली. सोमवारी (दि. 1) हे विद्यार्थी सकाळी नऊच्या विमानाने लखनौहून मुंबईत परतणार आहेत.
ठाण्यातील बेडेकर शाळेत सातवी ते नववीच्या वर्गात शिकणाऱ्या 16 विद्यार्थ्यांचा कॅम्प उत्तर प्रदेश येथील लखनौमध्ये गेला होता. शुक्रवारी त्यांची परतण्याची गाडी होती. मात्र, स्टेशनला उशिरा पोहोचल्याने त्यांची गाडी निघून गेली. त्यामुळे त्यांना स्टेशन परिसरातच रात्र काढावी लागली. शुक्रवारी सोबत असणाऱ्या शिक्षकांनी एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीकडून बस आरक्षित केली. बस मालकाने 35 हजार रूपये घेतले. अन् चारबाग परिसरात वाहनात बिघाड झाल्याचे सांगून पोबारा केला. त्यानंतर हे सर्वजण एका धर्मशाळेत आश्रयाला गेले. या मुलांच्या पालकांपैकी एकाने ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांना रात्री एक वाजता फोन करून सांगितली. प्रधान यांनी ही बाब लगेचच डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना कळविली. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी रात्रीच सूत्र हलविली. सर्वात आधी विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था केली. तसेच, तेथील काही लोकप्रतिनिधींशी चर्चा करून उद्या सकाळी 9 वाजेच्या विमानाची तिकिटे आरक्षित केली. हे सर्व विद्यार्थी सोमवारी साडेबारा वाजेपर्यंत मुंबईत येणार आहेत.