- श्वानांच्या संरक्षणासाठी घेतली आयुक्तांची भेट
- अर्थसंकल्पात निर्बिजीकरणासह सुविधा पुरविण्यासाठी तरतूद करा – मनोज प्रधान
ठाणे –
ठाणे महानगर पालिका हद्दीत भटक्या श्वानांची संख्या वाढत आहे. या श्वानांची देखभाल आणि काळजी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन ठामपाकडून होत नाही. या आदेशाचे पालन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील प्राणीप्रेमींनी आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली. या भेटीत प्रधान यांनी, ठामपाच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी केली. त्यावर राव यांनी प्राणी प्रेमींनी केलेल्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवून लवकरच निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले.
ठाणे शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे. या श्वानांची स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य व्यवस्था करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. याबाबत ही भेट घेऊन आयुक्तांशी चर्चा करण्यात आली या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले की, ठाणे शहरात निर्बिजीकरणासाठी भटक्या श्वानांना पकडून नेण्यात येत आहे. मात्र, हे श्वान परत आणून सोडले जात नाहीत. त्यामुळे या श्वानांचे काय होत आहे, याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता देण्यात येत नाही. वागळे इस्टेट भागात एक श्वान निर्बिजीकरण केंद्र आहे. मात्र, त्याची क्षमता अत्यल्प आहे. गर्दीच्या ठिकाणी असलेले भटके श्वान पकडून ते निवारा केंद्रात ठेवावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, ठाणे महानगर पालिकेने असे केंद्रच उभारलेले नाही. भटक्या श्वानांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फिडींग सेंटर्स (अन्नछत्र) उभारलेले नाहीत. भटक्या प्राण्यांसाठी ठाणे महानगर पालिकेचे स्वतंत्र आरोग्य केंद्र नाही. नसबंदीचे प्रमाण वाढविले जात नसल्याने भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात येत नाही. तसेच, श्वानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली असली तरी सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच हे स्मशान उघडे असल्याने अचानक एखादे श्वान दगावल्यास थेट जोगेश्वरी गाठावी लागत आहे. मंगळवारीच असा प्रकार घडला आहे. त्यामुळे ठाण्यातील स्मशानभूमी दोन सत्रात चालवावी, आदी मागण्या आयुक्त सौरव राव यांच्यासमोर ठेवल्या आहेत. या बाबत राव यांनी अनुकूलता दर्शविली आहे. आयुक्त सौरव राव यांनी, ठाण्यात दोन प्राणी आरोग्य केंद्र तसेच निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथे अद्ययावत केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे तेथील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ठाण्यात कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासन दिले असल्याचेही प्रधान यांनी सांगितले.या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, श्रीमती शिरोडकर, आरोग्य अधिकारी प्रसाद आदी उपस्थित होते.
