ठाणे :
तलावपाळी परिसरात घडलेल्या धक्कादायक हत्येच्या घटनेनंतर ठाणे जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शहरातील वाढत्या गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात एल्गार पुकारला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणत काँग्रेसने प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिस प्रशासन, ठाणे महानगरपालिका आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत तलावपाळी परिसराची संयुक्त पाहणी केली. यावेळी परिसरातील संशयास्पद हालचाली, अमली पदार्थांचे व्यसनी, ड्रग्ज विक्रेते आणि समाजकंटकांविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.तलावपाळीसारख्या गर्दीच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी घडलेल्या हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज काँग्रेसने अधोरेखित केली. परिसरात २४ तास पोलीस बंदोबस्त, वाढीव गस्त, सीसीटीव्ही यंत्रणेचे प्रभावी जाळे आणि ड्रग्जविरोधी विशेष मोहीम राबविण्याची मागणीही करण्यात आली.ठाणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. शहरातील वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्ज माफियांचा प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी,” अशी भूमिका काँग्रेसने मांडली. तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यात प्रशासन अपयशी ठरल्यास आणि मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास काँग्रेसकडून तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या पाहणी दौऱ्यात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गुन्हेगारांची दहशत आणि नागरिकांची भीती हे चित्र ठाण्याला मान्य नाही. प्रशासन जागे झाले नाही तर काँग्रेस त्यांना जागे केल्याशिवाय राहणार नाही.
— राहुल पिंगळे (अध्यक्ष, ठाणे जिल्हा काँग्रेस)
