@ ठाणे शहरातील घटना
@ सामाजिक कार्यात सहभागी होण्यास बंदी
ठाणे – आंतरजातीय विवाह केल्याने ठाणे शहरात राहणाऱ्या एका जैन कुटुंबावर समाजाने सामाजिक बहिष्कार घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदर कुटुंबाने पोलीस यंत्रणेसह सरकार दरबारी खेटे घालूनही न्याय मिळत नसल्याची माहिती ऍड.सागर कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोहनलाल छबिलाल जैन असे या बहिष्कृत कुटुंबाच्या प्रमुखाचे नाव आहे. ते नामदेव वाडी – पांचपाखाडी येथे वास्तव्यास असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गेल्या चार महिन्यांपासून या बहिष्काराचा सामना करावा लागत आहे.
ऍड.सागर कदम आणि सोहनलाल जैन यांनी सांगितले की, सन 2025 मध्ये बीसा नरसिंहपुरा दिगंबर जैन समाज, मुंबई यांच्यावतीने श्री बीसा नरसिंहपुरा दिगंबर जैन समाज (छप्पन-वागड) या ट्रस्टची स्थापना करण्यात आली. हा ट्रस्ट स्थापन करण्यामागे समाजाचे कल्याण आणि धार्मिक- सांस्कृतिक चळवळ चालविणे हा उद्देश होता. मात्र, या ट्रस्टचे अध्यक्ष महावीर धूलचंद टाया यांनी या उद्देशालाच हरताळ फासला आहे.
जानेवारी 2024 मध्ये दिगंबर पंथाचे सोहनलाल जैन यांचा मुलगा दिव्येश याचे लग्न 30 नोव्हेंबर 2025 रोजी श्वेतांबर समाजातील सलोनी राजेश शहा या मुलीशी ठरले होते. मात्र, या आंतरजातीय विवाहास श्री बीसा नरसिंहपुरा दिगंबर जैन समाज (छप्पन-वागड) चे अध्यक्ष महावीर टाया, महामंत्री राजेंद्रकुमार मेहता, प्रचार मंत्री जिनेंद्रकुमार सलीया, संजय भामावत, बसंतलाल भुखिया, अशोक ढोलिय, ललित पंचोली यांनी दिगंबर पंथाव्यतिरिक्त अन्यत्र सोयरिक करण्यास विरोध केला. या विरोधास सोहनालाल जैन यांनी न जुमानता विवाहाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे संतापलेल्या टाया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भांडूप येथील जैनम हाॅलमध्ये 24 ऑगस्ट 2025 रोजी बैठक बोलावून, दिगंबर जैन समाजाव्यतिरिक्त लग्न करणार्या कुटुंबावर बहिष्कार घालण्याचा सामाजिक कायदा केला. या कायद्यानुसार जो बहिष्कृत कुटुंबाला आपल्या कार्यक्रमात बोलवेन, त्यालाही बहिष्कृत करण्याचा नियम घालण्यात आला. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत सोहनलाल यांच्या घरातील लग्न समारंभास उपस्थित राहणाऱ्या दिगंबर जैन समाजातील नागरिकांना दंड आणि बहिष्कार अशी शिक्षा भोगावी लागेल, अशी घोषणा सोहनलाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तसेच, कुणाला आमंत्रण पत्रिका दिल्यास नग्न करण्याची धमकी सोहनलाल यांना देण्यात आली.
30 नोव्हेंबर रोजी दिव्येश आणि सोलोनी यांचा विवाह लग्नविधी संपन्न झाला. या सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या लोकांना माफीपत्र देण्यास लावून 11 हजार रूपये दंडाची रक्कम भरण्याचे आदेश वाॅटसॲप ग्रुपवर देण्यात आले. त्यानंतर 21 डिसेंबर 2025 रोजी सोहनलाल यांच्या मूळ गावी सभा बोलावून सोहनलाल जैन आणि त्यांच्या कुटुंबियांवर जाहीरपणे सामाजिक बहिष्कार घालण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर समाजाने सोहनलाल जैन यांच्याशी असलेले सबंध तोडले असून गेल्या चार महिन्यांपासून त्यांना कोणत्याही शुभ – अशुभ कार्यात सहभागी करून घेतले जात नाही. सामाजिक मेळाव्यात तसेच तसेच समाजातील कोणत्याही व्यक्तीशी कौटुंबिक किंवा व्यावसायिक सबंध ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या प्रकरणी सोहनलाल जैन यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याचे ऍड.सागर कदम यांनी सांगितले.
