रिंग मेट्रोचे नियोजित
घाणेकर स्थानक हलवणार..
- नागरिकांच्या सूचना-हरकतींवर प्रशासनाच्या हालचाली
- आमदार संजय केळकर यांचा पुढाकार..
ठाणे: ठाणे शहरातील नियोजित रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत रहिवाशांनी मांडलेल्या सूचना हरकतीनुसार आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठका आणि प्रत्यक्ष पाहणी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या पाहणीनंतर डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथील नियोजित स्थानक हलविण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. यामुळे येथे होणारी संभावित कोंडी टळणार आहे.
ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण दूर करण्यासाठी रिंग मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने होणाऱ्या या प्रकल्पासाठी १२ हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील कामेही लवकरच सुरू होणार आहेत. या प्रकल्पाचा मार्ग २९ कि.मी.असून काही मार्ग जमिनीखालून तर काही जमिनीवरून असणार आहे. हा मार्ग ज्या ठिकाणांहून जाणार आहे, त्या परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी आमदार संजय केळकर यांच्याकडे केल्या आहेत. त्या अनुषंगाने श्री. केळकर यांनी शासकीय विश्रामगृहात आतापर्यंत दोन संयुक्त बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकीत हिरानंदानी मेडोज, रोडाज, ऋतू इस्टेट, हिरानंदानी इस्टेट आदी भागातील रहिवाशांचे प्रतिनिधी, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि ठाणे शहरातील प्रकल्पाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.
ज्या ठिकाणी हजारो नागरिक वास्तव्य करतात, शाळा, दवाखाने यामुळे नेहमीच वर्दळ असते, अशा ठिकाणी स्थानक उभारल्यास या परिसराची कोंडी होणार असल्याच्या तक्रारी रहिवाशांच्या प्रतिनिधींनी या बैठकांमध्ये केल्या. यावेळी श्री. केळकर यांनी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून लोकहिताचा मार्ग काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकारी आणि रहिवाशांसमवेत नुकतीच संयुक्त पाहणी केली. नियोजित २२ स्थानकांपैकी डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथील स्थानक भर चौकात असल्याने या परिसराची मोठी कोंडी होणार आहे. त्यामुळे हे स्थानक हलवण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार हे स्थानक १५० मीटर पुढे हलविण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. यामुळे या परिसराची संभावित कोंडी टळणार असल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली.
याबाबत बोलताना श्री. केळकर म्हणाले, या प्रकल्पाबाबत रहिवाशांच्या तक्रारी आहेत. हा प्रकल्प शहराच्या आणि नागरिकांच्या हिताचा आहे, त्यामुळे न्याय असेल तेथे बदल करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे श्री. केळकर यांनी स्पष्ट केले.
