ठाणे : ठाणे, इतिहासाला धर्माच्या अरुंद चौकटीत बंदिस्त करण्याच्या प्रवृत्तीला ठाम प्रत्युत्तर देत, शिवाजी कोण होता? या गोविंद पानसरे लिखित पुस्तकावर आधारित ‘अभिवाचन’ कार्यक्रम ठाण्यात जोरदार आणि विचारप्रवर्तक वातावरणात पार पडला.
अस्मिता वाचनालय, शिक्षण व जमीन हक्क मंच, शेतकरी सेवा संघ, महाराष्ट्र (ठाणे जिल्हा समिती) आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विभाग) ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने “शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कोणता?” असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला. या ‘अभिवाचना’त किशोर भोईर, अशोक मोहिते, प्राचार्य मच्छिंद्र तिगोटे, प्रमोद तामसे, राजन देसाई, छाया ठाणेकर, संगिता जांभळीकर, शिवाजी देसाई, चंद्रकांत शिंगरे, दिपक उपाध्ये यांनी प्रभावी सहभाग नोंदवला. तर पत्रकार अनिल ठाणेकर यांनी प्रत्येक मुद्द्याचे परखड आणि चिकित्सक विश्लेषण करत कार्यक्रमाला धार दिली.“आगळा राजा शिवाजी” : लोकाभिमुख राज्यकर्त्याचा चेहरा उलगडण्यात आला. ‘अभिवाचना’त ‘लोकशाहीत राजाचे कौतुक’, ‘राज्य संस्थापक’, ‘आपले कार्य आपले राज्य’, ‘आत्माहुतीच्या प्रेरणा’ आणि ‘जहागिरी-इनामदारी-वतनदारी’ यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करताना शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हते, तर लोकांच्या हक्कांसाठी उभे राहणारे परिवर्तनवादी नेतृत्व होते, हा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला.“रयतेची कणव असलेला राजा” : सामाजिक न्यायाचा धडा, ‘शिवाजी व स्रियांची अब्रू’, ‘शिवाजी आणि रयत’, ‘शेतकऱ्यांचे सैन्य’, ‘व्यापार-उद्योगास संरक्षण’, ‘गुलामगिरीविरोध’ या मुद्द्यांवरून शिवाजी महाराजांची धोरणे ही शोषणाविरोधात उभी राहणारी आणि रयतेच्या हिताची होती, हे स्पष्ट करण्यात आले. “राजा म्हणजे केवळ सत्ताधारी नव्हे, तर जनतेचा संरक्षक” ही भूमिका ठामपणे मांडण्यात आली. “धर्मश्रद्ध पण धर्मद्वेष्टा नव्हे” : इतिहासाच्या विकृतीकरणावर थेट हल्ला करण्यात आला. कार्यक्रमातील सर्वात धारदार भाग ठरला तो धर्माच्या मुद्द्यावरचा. ‘शिवाजी व मुसलमान’, ‘मुस्लिम सरदार’, ‘धार्मिक सहिष्णुता’, ‘राज्य मुख्य-धर्म दुय्यम’ या मुद्द्यांवर चर्चा करत, शिवाजी महाराजांना एकांगी “हिंदू राजा” म्हणून मांडण्याचा प्रयत्न हा इतिहासाचा अपमान असल्याची जोरदार टीका करण्यात आली. “शिवाजी महाराजांचा संघर्ष हा धर्माविरुद्ध नव्हे, तर अन्यायाविरुद्ध होता” हा निष्कर्ष स्पष्टपणे मांडण्यात आला. आता विचारांचा लढा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. कार्यक्रमात उपस्थितांनी ‘अभिवाचना’स केवळ वाचन न मानता “विचारांची चळवळ” असे स्वरूप दिले. इतिहासाचे राजकारण करणाऱ्यांविरोधात बौद्धिक लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या पुस्तकाच्या दुसऱ्या व अंतिम भागाचे ‘अभिवाचन’ येत्या रविवारी, ७ जून रोजी, सायंकाळी ५.३० वाजता, अस्मिता वाचनालय, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (प) येथे होणार असून, अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून “खरा इतिहास जाणून घेण्याच्या या ‘अभिवाचन’ चळवळीत” सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
