ठाणे – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष किरण रामकृष्ण पाटील यांच्या पुढाकाराने मल्लखांब स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून मराठी भाषा आणि संस्कृतीसोबतच पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.
या स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मल्लखांब या पारंपरिक क्रीडा प्रकारातील ताकद, संतुलन आणि कौशल्य यांचे अप्रतिम दर्शन स्पर्धकांनी घडवून आणले. उपस्थित प्रेक्षकांनी खेळाडूंचे कौतुक करत त्यांना भरभरून दाद दिली.
कार्यक्रमादरम्यान किरण रामकृष्ण पाटील यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अशा सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक उपक्रमांद्वारे तरुण पिढीला आपल्या परंपरेची ओळख करून देणे हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. १५००० हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात आले
मराठी भाषा दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेली ही मल्लखांब स्पर्धा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
