ठाणे :
" सध्या जग झपाट्याने विकास करत आहे. पण वनसंपदा, जलसंपदा, जनसंपदा, भूसंपदा, आणि गोसंपदा सांभाळून मानवकेंद्री विकासाची व्याख्या समजुन घेण्याची गरज असल्याचे मत पदमश्री वनबंधू चैत्राम पवार यांनी व्यक्त केले. जोशी - बेडेकर कला - वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटतर्फे "जीवन परिवर्तन - सामूहिक सेवेचे सामर्थ्य" या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उदघाट्नप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक, डॉ. विनोद चांदवानी, डॉ.श्वेता अहिरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चैत्राम पवार पुढे म्हणाले," धुळे जिह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम अश्या बारीपाडा या ओसाड माळरानावर आनंदवन लोकसहभागातून फुलले. लोकशक्तीची इच्छाशक्ती जेव्हा विकासाचा निर्धार करते तेव्हा खऱ्या अर्थाने विकासाची गंगा वाहते. लोकचळवळ अतिशय महत्वाची आहे. अस्तित्व आणि अस्मिता सांभाळून विकास व्हायला हवा.""एकमेकांना समजून घेत पुढे जायचे असते तेव्हा विकासाची गुरुकिल्ली हाती लागत असल्याचे सांगून प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक म्हणाल्या,"
भगवद्गीता या ग्रंथातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. सर्वांनी एकत्र येऊन सर्वांना समजून घेत समाजसेवेचा वसा अधिक समृद्ध केला पाहिजे.”राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांना समाजसेवेच्या विविध कसोट्या सोप्या पद्धतीने समजत असल्याचे डॉ.विनोद चांदवानी यांनी सांगितले. कॉलेजने पूर्वीचे शहापूर तालुक्यातील दत्तक घेतले टाकीपठार गाव आणि आता दत्तक घेतलेले उंबरमाळी गाव येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.यावेळी एन. एस.एस. च्या विद्यार्थ्यांनी लक्ष्यगीत सादर केले. त्यासोबतच या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याला उपस्थितांची दाद मिळाली. संपूर्ण दिवसभरात विविध अभ्यासक उपस्थित होते. त्यांनी आपले संशोधन पेपर सादर केले. या परिषदेत वैचारिक आदानप्रदान मोठ्या प्रमाणात झाले. राष्ट्रीय परिषदेच्या समारोपासाठी श्री.राजाराम कटारा उपस्थित होते. परिषद यशस्वी करण्यासाठी प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक, डॉ.विनोद चांदवानी, डॉ.श्वेता अहिरे, प्रा.रुपेश महाडिक,प्रा. सुदाम अहिरराव, प्रा.सुरभी खरे ,प्रा.इप्सिता दत्ता यांच्यासह विविध समित्यांचे प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांनी अमूल्य योगदान दिले.
