ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा एकत्रित जल्लोष
ठाणे :
मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत जाहिर करताच ठाण्यात एकच जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील विष्णुनगर येथील कार्यालयाबाहेर गुलाल उधळून फटाके फोडत मिठाई वाटण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यानी आता “ठाकरे ब्रॅण्ड” सर्व महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा बॅण्ड वाजवणार असल्याचा इशारा देण्यात आला.
राज्यातील २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १५ जानेवारी रोजी मतदान केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, १९ वर्षानंतर शिवसेना आणि मनसेने युती केली. दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आल्यानंतर ठाण्यात जल्लोष करण्यात आला. मनसेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, महिला शहर प्रमुख समिक्षा मार्कंडे यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा, विष्णुनगर येथील मनसे मुख्यालयासमोर गुलाल उधळुन फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. या जल्लोषात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे हे देखील सहभागी झाले होते. दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आल्याने महाराष्ट्र विशेषतः मराठी माणुस सुखावल्याची प्रत्येक कार्यकर्त्याची भावना होती. किंबहुना, जल्लोष केल्यानंतर शिवसेना – मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी राज्यात आता “ठाकरे ब्रॅण्ड” च चालणार असुन येत्या निवडणुकीत हा ठाकरे ब्रॅण्ड सर्व महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा बॅण्ड वाजवणार असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मनसे कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि ठाकरे समर्थक नागरीक उपस्थित होते.
