ठाणे –
राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाण्यात वाद तीव्र झाला आहे. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी या निर्णयाला विरोध दर्शवत मोठ्या प्रमाणावर संपाचा इशारा दिला आहे. सुमारे १५ लाख चालक रस्त्यावर उतरतील, असा दावा संघटनांकडून करण्यात आला आहे. दरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांनी अमराठी रिक्षा चालकांचा नेमका आकडा किती? याचा थेट पुरावाच दिला आहे. तसेच १ तारखेला तुम्ही संप करा नाहीतर यूपी-बिहारला परत जा आम्हाला काही फरक पडणार नाही असा इशाराही परप्रांतीय रिक्षा चालकांना दिला आहे.
राज्यात परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी १ मेपासून मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिल्यानंतर रिक्षा, टॅक्सीचालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. परवाने रद्द केल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे या निर्णयाला रिक्षा, टॅक्सीचालक संघटनांनी थेट विरोध दर्शविला आहे. यावर ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी परप्रांतीय रिक्षा चालकांना १ तारखेला तुम्ही संप करा नाहीतर यूपी-बिहारला परत जा आम्हाला काही फरक पडणार नाही असा थेट इशारा दिला आहे. तसेच समाज माध्यमांवर पोस्ट करत अमराठी रिक्षा चालकांचा नेमका आकडा किती? याचा थेट पुरावाच दिला आहे.
काय म्हणाले अविनाश जाधव?
४ दिवसांपासून ऐकतोय १५ लाख रिक्षावाले संपावर जाणार आहेत. खरतर मुंबई आणि ठाणे, रायगड मध्ये ४ लाख रिक्षा आहेत. त्यातून ६०-६५% रिक्षा चालक हे मराठी आहेत, मग यूपी -बिहार वरून संपासाठी आणखीन रिक्षा मागवणार आहेत का ? खोटे आकडे सांगून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम काही लोक करत आहेत, ह्या सगळ्यांना सांगतो १ तारखेला तुम्ही संप करा नाहीतर यूपी-बिहार ला परत जा आम्हाला काही फरक पडणार नाही. खात्रीने सांगतो एकही माणूस १ तारखेला रिक्षाची वाट बघत थांबणार नाही, वेळप्रसंगी आम्ही आमच्या गाड्या काढू लोकांना घरापर्यंत पोहचवायला. महाराष्ट्रात आम्हाला चैलेंज करायला जाऊ नका… लई महागात पडेल, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला आहे.
परवाना तपासणीची प्रक्रिया
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या परवान्यांची नव्याने तपासणी सुरू करण्यात आली आहे. चालकाला साध्या मराठीत संवाद साधता येतो का, याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. केवळ कागदोपत्री अट पूर्ण करणे पुरेसे नसून बोलणे आणि समजणे आवश्यक असेल. स्थानिक भाषा शिकण्यास इच्छुक चालकांना मदत केली जाईल; मात्र जाणीवपूर्वक नियम टाळणाऱ्यांवर कारवाई करत परवाने रद्द केले जाऊ शकतात.