पदवी परीक्षेत यश मिळविल्यानंतर त्या यशाची पावती म्हणजे पदवी प्रमाणपत्र. मान्यवरांच्या हस्ते हे प्रमाणपत्र मिळाले तर त्या यशाचा आनंद नक्कीच द्विगुणित होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात पी सावळाराम सभागृहात आणि ए.व्ही.रूम येथे मोठ्या उत्साहाने दि.१८ एप्रिल, २०२६ रोजी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ.शिवराम गर्जे तर सन्माननीय अतिथी म्हणून ठाणे महापालिकेच्या महापौर सौ.शर्मिला पिंपळोलकर, ठाणे महापालिकेतील शिवसेना गटनेते श्री.पवन कदम, साहाय्यक पोलीस आयुक्त आणि ज्ञानसाधना महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.रवीदत्त सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शाल व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष आणि खासदार सतीश प्रधान यांच्या स्मृती तेवत ठेवणारी 'अक्षतांजली' ही स्मरणिका देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या दीक्षांत समारंभात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साली पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 390 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दीक्षांत समारंभासोबत महाविद्यालयाने या सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी बॉक्स क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. पदवी प्रमाणपत्रासोबत क्रिकेटमुळे महाविद्यालयातील त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. प्रास्ताविक सादर करताना "पदवी प्रमाणपत्र प्राप्त करणे हा जीवनातील महत्त्वाचा क्षण असतो. शिक्षणाच्या पायावर आपला अखंड जीवनप्रवास सुरू असतो. आजवर गेल्या ४५ वर्षात जवळपास ६५ हजार विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षित झाले अशी या महाविद्यालयाची पार्श्वभूमी आहे. कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या आर्थिक, सामाजिक व सर्वांगीण विकासास प्राधान्य देणारे हे एक स्वायत्त महाविद्यालय आहे. यंदा कनिष्ठ महाविद्यालयाला ए प्लस श्रेणी तसेच वरिष्ठ महाविद्यालयाला यंदा स्वायत्त दर्जा मिळाला आहे. महाविद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या आजवरच्या यशात प्राध्यापक सहकाऱ्यांचे योगदान खूप मोठे आहे." अशी भावना प्राचार्य डॉ.गणेश भगुरे सर यांनी व्यक्त केली. सन्माननीय अतिथी साहाय्यक पोलीस आयुक्त श्री.रवीदत्त सावंत यांनीही यावेळी माजी विद्यार्थी म्हणून आपल्या भावना मांडल्या.
ते म्हणाले, “मी १९९०-९१ बॅच चा विद्यार्थी, आमचे कुटुंब ठाण्याला स्थलांतरित झाल्यामुळे मला कॉलेजमध्ये प्रवेशाची अडचण होत होती. त्यावेळी प्रधान साहेबांची मदत मिळाली आणि ज्ञानसाधनाबरोबर माझा प्रवास सुरू झाला. आजचे जग स्पर्धात्मक असून तुम्ही लवकरात लवकर ध्येय निश्चित करून आपल्या आवडत्या क्षेत्रात यश संपादन करणे आवश्यक आहे. मी पहिल्या प्रयत्नात वयाच्या २३ व्या वर्षी एम.पी.एस.सी परीक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालो. या महाविद्यालयातील शिक्षक व मित्रांचे मिळालेले प्रेम माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ठाणे महापालिकेतील शिवसेना गटनेते श्री.पवन कदम यांनी यावेळी प्रधान साहेबांच्या स्मृती जागविल्या.
राम गणेश गडकरी नाट्यगृह, दादोजी कोंडदेव स्टेडियम उभारणारे तसेच नगराध्यक्ष, महापौर, खासदार असताना दिवंगत ज्येष्ठ नेते श्री.सतीश प्रधान यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांची विचारसरणी, देहबोली आमच्यासाठी प्रभावी होती. त्यातूनच मी घडत गेलो, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना महाविद्यालयातून दीक्षा प्राप्त केल्यानंतर जीवनात वेगळे वळण मिळेल, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, असे ते म्हणाले.
ठाणे महानगरपालिकेच्या महापौर सौ.शर्मिला पिंपळोलकर यांनी विद्यार्थ्यांसमोर विचार मांडताना
“शिक्षण हे पायाभूत अंग आहे, शिक्षणाशिवाय जीवनाला आधार नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा बाबासाहेबांचा मूलमंत्र जीवनात यश प्रदान करतो. शिक्षणाचा पाया थांबला तरी, शेवटच्या श्वासापर्यंत व्यवहारिक शिक्षण मिळेल, ते आत्मसात करावे. असा संदेश दिला. तर या महाविद्यालयात सतीश प्रधान यांच्यानंतर ज्ञानदानाची धुरा उत्तम पद्धतीने पुढे नेण्याचे काम कमलेश प्रधान करताहेत, असे म्हणत महाविद्यालयीन नेतृत्वाची त्यांनी प्रशंसा केली.
कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे डॉ.शिवराम गर्जे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना
त्यांनी काही प्रेरक कथा सांगून भाषणात रंग चढवला.
विद्यार्थीदशेतील स्वतःचा आजवरचा रंजक प्रवास त्यांनी सांगितला, विद्यार्थीदशेतील किस्से विद्यार्थ्यांपुढे मांडले. “पालक, शिक्षक हे जीवनातील आद्यगुरू आहेत” असे, ते म्हणाले.
“तुम्ही तुमचे काम योग्यरित्या करत असाल तर सर्वजण तुम्हाला प्रोत्साहन देतील, आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक नवनवीन गोष्टी शिकणे गरजेचे आहे. अपयशाला घाबरून न जाता सामोरे जा” असा मौलिक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
तर, “तुम्ही आज आयुष्यातला मोठा टप्पा पार पाडला आहे, इथून पुढे तुम्हाला तुमचे आयुष्य घडवायचे आहे. पदव्युत्तर पदवी घ्या, आणखी वेगळे ज्ञान आत्मसात करा” असा सल्ला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.कमलेश प्रधान यांनी विद्यार्थ्यांना दिला. महाविद्यालयातील नोकरी करून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मला अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनात संस्थेचे अध्यक्ष श्री.कमलेश प्रधान, सचिव डॉ.मानसी प्रधान, खजिनदार श्री.सतीश शेठ, प्राचार्य डॉ.गणेश भगुरे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. समिती समन्वयक डॉ.बाबासाहेब कांबळे आणि सर्व समिती सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शीतल गाणार यांनी केले. प्रा.मृगया गायकवाड यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तसेच आभार प्रदर्शनही केले.
