शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही
ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय (HSR) येथे बारवी गुरूत्ववाहिनी क्र. 1,2 व 3 वर वाहिन्याचे उन्नतीकरण व तातडीचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी, गुरूवार दिनांक 29/01/2026 रोजी रात्री 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक 30/01/2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.